सौभाग्य’ योजनेंतर्गत महाराष्ट्रातील नऊ हजार घरांना वीज जोडणी
नवी दिल्ली – देशातील गोर-गरीब जनतेच्या घरात वीज पोहचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या “प्रधानमंत्री सहज बिजली हर घर-सौभाग्य’ योजनेंतर्गत आतापर्यंत देशातील 16 हजार 850 खेड्यांना मोफत वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. यात महाराष्ट्रातील 192 खेड्यांचा यात समावेश असून 8 हजार 820 घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे.
केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या ग्राम स्वराज विभागाच्या वतीने व केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या मदतीने देशातील वीज जोडणीपासून वंचित असलेल्या गोर-गरीब जनतेला वीज जोडणी देण्यासाठी प्रधानमंत्री सहज बिजली हर घर-सौभाग्य’ योजना सप्टेंबर 2017 मध्ये सुरु करण्यात आली.
या योजनेचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या योजनेनुसार देशातील प्रत्येक खेड्याला मार्च 2019 पर्यंत वीज जोडणी देण्याचे उदिष्ट्य ठेवण्यात आले आहे. गेल्या 7 महिन्यांत देशभरातील 27 राज्य व केंद्र शासित प्रदेशातील 16 हजार 850 खेड्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे. ज्याद्वारे 5 लाख 19 हजार 358 घरांना जोडणीचा लाभ मिळाला आहे.