सिग्नेचर पुल ठरणार दिल्लीतल्या पर्यटकांचेही आकर्षण
- उद्घाटन समारंभावेळी भाजप खासदाराचे आकांडतांडव
नवी दिल्ली- दिल्लीत यमुना नदीवर बांधण्यात आलेल्या वैशिष्ट्यपुर्ण सिग्नचेर पुलाचे आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. उत्तर आणि उत्तरपुर्व दिल्लीतील अंतर या पुलाने कमी होणार आहे. तसेच वझिरीबाद पुलावरील वाहतुकीचा ताण या पुलामुळे कमी होणार आहे. या 675 मीटर लांबीच्या या पुलाचा काही भाग केबल ने जोडण्यात आला असून या पुलावरून दिल्लीचे विहंगम दृष्यही दिसणार असल्याने हा पुल पर्यटकांसाठीही आकर्षण ठरणार आहे. गेले अनेक दिवस हा पुल प्रतिक्षेत होता. या पुलाच्या उभारणीसाठी पंधराशे कोटी रूपये खर्च आला आहे.
आम आदमी पक्षाच्या सरकारने अत्यंत निकाराचा प्रयत्न करून या पुलाचे काम मार्गी लावले. या पुलाच्या उभारणीतही भाजपने अडथळे आणल्याचा आरोप उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला. ते म्हणाले की या पुलाच्या कामासाठी जे अत्यंत कार्यक्षम आणि निस्पृह अभियंते कार्यरत होते त्यांची बदली करण्यात आली आणि येथे दुय्यम दर्जाच्या अभियंत्यांना आणि कर्मचाऱ्यांना नेमण्यात आले. दरम्यान या पुलाच्या उद्घाटनाच्यावेळी भाजपचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष खासदार मनोज तिवारी यांनी तेथे निदर्शने केली.
आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांनी उद्घाटनस्थळी जाऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना तेथेच अडवण्यात आले. त्यावेळी त्यांची पोलिसांशी झटापट झाली. मला धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसांना मी हेरले असून येत्या चार दिवसात आपण त्यांना त्यांची लायकी दाखवून देऊ असे त्यांनी म्हटले आहे. हा पुल म्हणजे समस्त दिल्ली वासियांसाठी अभिमानाचा विषय आहे असे मनिष तिवारी यांनी म्हटले होंते. 1999 पासून असा पुल दिल्लीत उभारण्याची गरज व्यक्त केली गेली होती. या आधी दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेच्या आधी या पुलाची उभारणी पुर्ण करण्याचा प्रयत्न झाला होता पण तो प्रयत्नही फसला होता.आता अखेर हे काम मार्गी लागले आहे.