सरकार क्षुल्लक दरवाढ कमी करून जनतेला फसवणार -पी.चिदंबरम
नवी दिल्लीः देशातील पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले असताना आणि महागाईचा भडका उडाला आहे. त्यामुळे नागरिकांना राग अनावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचीच धडकी घेऊन सरकारही कामाला लागल्याच्या बातम्या येताहेत. परंतु, केंद्र सरकारने ठरवले तर ते पेट्रोल-डिझेलच्या किंमती २५ रुपयांपर्यंतही कमी करू शकतं, असा दावा माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी केला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यात. त्यामुळे लिटरमागे सरकारला १५ रुपये कमी मोजावे लागत आहेत. तरीही, सरकार नागरिकांच्या खिशातून ही रक्कम काढत आहे. त्यासोबतच, १० रुपयांचा अतिरिक्त करही जनतेकडून वसूल केला जात आहे. तो थांबवल्यास, जनतेला इंधन दरात थेट २५ रुपयांचा दिलासा मिळू शकेल, असे ट्विट चिदंबरम यांनी केले आहे. त्याचवेळी, सरकार असे काही करणार नाही, पेट्रोल-डिझेलचे दर १-२ रुपयांनी दर कमी करून ते नागरिकांना फसवतील, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.