सरकारविरोधात काँग्रेसचे पिंपरीत ‘गाजर’ वाटप आंदोलन
पिंपरी: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये टाकू, शेतीमालाला हमी भाव देवू, तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतील, अशी विविध आश्वासने दिली होती. परंतु, सरकाराल तीन वर्ष पुर्ण होत आली तरी एकाही आश्वासनांची पुर्तता केली नाही. भाजप सरकारने केवळ आश्वासने देवून जनतेची फसवणूक केली आहे, अशी टीका काँग्रेसचे शहराध्य सचिन साठे यांनी केली. तसेच अपयश झाकण्यासाठी सरकार जाती-धर्मांमध्ये भांडणे लावत आहे, असेही ते म्हणाले.
पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने आज (गुरुवारी) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात तीन वर्षात केंद्र सरकार अपयशी ठरल्याच्या आरोप करत ‘गाजर’ वाटप आंदोलन केले. त्यावेळी साठे बोलत होते. महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, श्यामला सोनवणे, संगिता कळसकर, बिंदु तिवारी, शोभा मिरजकर, संग्राम तावडे, युवक काँग्रेसचे नरेंद्र बनसोडे, सुदाम ढोरे, राजेंद्र वालिया, मयुर जयस्वाल, क्षितीज गायकावड, विरेंद्र गायकवाड, ज्येष्ठ नागरिक संघाचे लक्ष्मण रुपनर, अनिरुद्ध कांबळे, सौरभ शिंदे, वसंत मोरे आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
कामगार, नोकरदार, शेतकरी, व्यावसायिक सर्वंच वर्गातील लोक सरकारावर नाराज आहेत, असे सांगत साठे म्हणाले, भाजपने एकाही आश्वासनांची पुर्तता केली नाही. आश्वासने पुर्ण करण्याच्या दिशेनेही त्यांची वाटचाल देखील सुरु नाही. शेतक-यांच्या आत्महत्या वाढत आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या असून देशातील आकडा भयावह आहे.