सत्याचे कलात्मक दर्शन घडवतो, तो खरा कलाकार – डॉ. रामचंद्र देखणे
- ‘कलारंग’ संस्थेतर्फे ‘कलासंगम सोहळा’
- 150 कलाकारांचा कलागौरव पुरस्काराने सन्मान
पिंपरी – “सत्याचे विश्व वेगळे आणि कलेचे विश्व वेगळे असते. माणसं सत्याच्या विश्वाला कलेचे विश्व समजतात. पण, सत्याच्या विश्वाला कलेच्या विश्वात आणून ठेवतो आणि सत्याचे कलात्मक दर्शन घडवतो, तो खरा कलाकार”, अशा शब्दांत संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी कलाकाराची व्याख्या चिंचवडमध्ये रविवारी (दि.15) केली.
कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त कलारंग कला संस्था आणि संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.15) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित ‘कलासंगम सोहळा 2018’ सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी सिने अभिनेत्री आशा काळे, आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर शैलजा मोरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी, हरहरे हेमंतराव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नगरसेवक अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, आश्विनी जाधव, प्रियंका बारसे, शितल शिंदे, बाबू नायर, कैलास कुटे, भाजपा प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, उमा खापरे, शिवसेना महिला संघटिका सुलभा उबाळे, प्रवचनकार मधू जोशी, संदीप जाधव आदी उपस्थित होते. यानिमित्त भाऊसाहेब भोईर, नंदकिशोर कपोते, प्रवीण तुपे, डॉ. सतिश गोरे, बाळ जुआटकर, राजन लाखे, सतिश वर्तक, किरण एवलेकर, तेजश्री अडीगे, संजय कांबळे, राज आहेरराव, वैशाली पळसुले, दत्तोबा पाचंगे, देवदत्त कशाळीकर, सुनिल शेगावकर, लक्ष्मण गावंडे, विश्वास करंदीकर, आणि नाना शिवले यांना विशेष कलागौरव पुरस्कार, तर शहरातील 150 कलाकारांना कलागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले की, शहरामध्ये कला, संगीत, साहित्य, संस्कृतीच्या क्षेत्रात काम करणा-या अनेकांचा हा सत्कार समारंभ आहे. दुरदृष्टीने या शहराची सांस्कृतिक वाटचाल होते आहे. वेगवेगळ्या रंगाच्या म्हणजे अभिनय, कला, उद्योग अशा पाकळ्यांचे एकच फूल या रंगमंचावर मला अनुभवता आले. कलेच्या माध्यमातून सुर्याशी व गंगेशी नाते जोडणा-या सर्वांना अभिवादन करण्याची ही संधी आहे. उद्योगनगरी ही सांस्कृतिक व कलानगरी व्हावी, ही अपेक्षा सर्वांची आहे.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, औद्योगिकनगरीची सांस्कृतिकनगरीकडे वाटचाल होत आहे. ही चळवळ शहरात भाऊसाहेब भोईर यांनी सुरू केली. त्यांना खांद्याला खांदा देऊन अमित गोरखे यांच्यासारखे अनेक जण मिळून ही चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. या पुरस्कारामुळे अनेकांना प्रेरणा मिळते. त्या प्रेरणेतून इतिहासाची पाने वाढविण्याचा प्रयत्न व्हावा.
भाऊसाहेब भोईर म्हणाले, कलेला कोणतीही जात, धर्म नसते. शहराच्या वाटचालीत भर टाकणा-या अनेक कलाकारांचा हा सन्मान सोहळा आहे. शहराची सांस्कृतिक भूक भागविण्याचे काम आम्ही करतो आहोत. संस्कारातून सुसंस्कृतपणे अनेक कलाकार निर्माण होत असून अनेक जण शहरातील कला क्षेत्रासाठी काम करत आहेत.
प्रास्ताविक करताना अमित गोरखे म्हणाले की, 1998 साली कलारंगची स्थापना केली. आज 20 व्या वर्षात संस्थेने पदार्पण केले आहे. संस्थेतर्फे दिला जाणार कलागौरव हा प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. आज अखेर 356 कलाकारांना या पुरस्काराने गौरव झालेला आहे. चित्रपट, नाटक आणि कला क्षेत्रातील नामवंत 176 कलाकारांनी कलारंगच्या कार्यक्रमांना प्रेमापोटी उपस्थिती लावली.
सरोज राव यांनी सूत्रसंचालन केले. कलारंगचे उपाध्यक्ष शैलेश लेले, महेश नलावडे, दिनेश देशमुख यांनी संयोजन केले.