शेतकऱ्यांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन रविनाचा ‘यू टर्न’

शेतकरी आंदोलनावर भाष्य करणाऱ्या अभिनेत्री रविना टंडनने स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या ट्वीटचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. शेतकऱ्यांना नाही, तर शेतमालाची नासधूस करणाऱ्या समाजकंटकांना अटक करा, असं म्हणाल्याचं तिने सांगितलं.
शेतकरी आंदोलनाच्या एका बातमीवर कमेंट करत रविनाने ट्वीट केलं होतं. ज्यामध्ये शेतमाल फेकून देतानाची दृष्य दिसत होती. “अतिशय क्लेशदायक घटना आहे. आंदोलनाची ही पद्धत भीषण आहे. सार्वजनिक संपत्ती, वाहतूक आणि साहित्याचं नुकसान करणं दुर्दैवी आहे. आंदोलकांना तातडीने अटक करावी आणि त्यांना जामीनही देऊ नये.”, असं ट्वीट रविना टंडनने केलं होतं.
या ट्वीटनंतर रविना टंडनला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर रविनाने आपल्या ट्विटचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांना नाही, शेतमालाची नासधूस करणाऱ्या समाजकंटकांना अटक करा, असं म्हणाले असल्याचे स्पष्टीकरण रविना टंडनने दिले आहे.