शेतकऱ्यांचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करू नका: खासदार राजू शेट्टी
बारामती – शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आसूड यात्रा काढणाऱ्या आमदार बच्चू कडू यांच्यावर पोलिसांच्या मार्फत दडपशाही केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्यांना पोलीस बळाचा वापर करून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न सरकारने करू नये, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी केली.
बारामतीत पत्रकारांशी बोलताना शेट्टी यांनी सरकारमध्ये रहायचे की नाही याबाबत योग्य वेळी निर्णय घेऊ, असा इशारा देत म्हणाले, नैसर्गिक आपत्ती आणि शेतीमालाच्या पडलेल्या भावामुळे राज्यातील शेतकरी त्रस्त आहेत, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करावे, अशी मागणी मागील एक वर्षापासून आम्ही करीत आहोत. शेतकऱ्यांना कर्जमुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पंतप्रधानांनी सत्तेवर येण्यापूर्वी आश्वासन दिले होते. 3 वर्षानंतर देखील स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी केली नाही. ही बाब गैर आहे, अशी टीका शेट्टी यांनी केली.
आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे आहे. सत्तेचे आम्हाला घेणेदेणे नाही. केंद्र व राज्य सरकारने कर्जमाफी केली तर ती शेतकऱ्यांवर मेहरबानी नसेल. कर्जमुक्ती दिली तरच शेतकरी तरणार आहे. याबाबत कायदेशीर दृष्ट्या आम्ही मागण्या करीत आहोत. कर्जमाफी दिली नाही तर या सरकारला देखील उलथावून लावण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे. आम्हाला सत्तेची हाव नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतो. त्यांच्याच प्रश्नांवर यापुढे देखील लढा चालू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतिश काकडे आणि स्वाभिमानीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.