शिवसेना मोदींच्या मिठीत कशी शिरते? : जयंत पाटलांचा उद्धव ठाकरेंना सवाल
जळगाव : पाच वर्ष भाजप आणि मोदी- शहांवर टीका करणारी शिवसेना आता हळूच त्यांच्या मिठीत कशी काय शिरते असा सवाल करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
जळगाव लोकसभा मतदारसंघातील संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ आज चाळीसगाव येथे जाहीर सभा पार पडली. त्यावेळी जयंत पाटील बोलत होते. निवडणुकीत मतदान करण्याआधी मोदींच्या नाकर्तेपणाच्या मुद्द्यांवर विचार करावा असे आवाहनही त्यांनी केले.
जयंत पाटील म्हणाले की, जळगावच्या भाजपने देशापुढे एक नवा धडा घालताना एकमेकांची गचांडी धरण्याचे काम जनतेपुढे केले. नोटाबंदीनंतर कमीशनवर नोटा बदलण्याचे काम झाले. देशाला सर्व बाजूने लुटण्याचे काम झाले आहे. भाजपाने साम दाम दंड भेद या मार्गाने काम करण्याची भूमिका घेतली आहे. काल परवा झालेल्या विदर्भातील निवडणूकीत सर्व जागांवर भाजपाचा पराभव होण्याचीच चिन्हे आहेत असे स्थानिक सांगत आहेत. आपण बूथ कमिटीवर जोर देण्याची गरज आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणूकीसोबत विधानसभेचा आकडा हा नक्कीच वाढेल यामध्ये बुथ कमिटीचा वाटा मोठा असेल यात शंका नाही असेही ते म्हणाले.
स्त्री-पुरुषांच्या समानतेविरोधी हे सरकार घटना बदलण्याचे काम करणार असल्याचे सांगतात. यावर देशाला चिंता लागली आहे. याचा विचार आपण करावा व गुलाबराव अप्पा देवकर यांना प्रचंड बहुमताने निवडुन देण्याचे आवाहनही पाटील यांनी केले.