विधानपरिषद: कौल कोणाच्या बाजूने रहाणार; उमेदवारांमध्ये अस्वस्थता
बीड : उस्मानाबाद, लातूर, बीड स्वराज्य संस्थेचा निकाल आता आवघ्या काही तासावर आला आहे. भाजप व राष्ट्रवादी काँगेसच्या पुरस्कृत उमेदवारांमध्ये अस्वस्थता असल्याचे चित्र आहे. अगदीच थोडक्या मतांचे गणित असलेल्या या विधानपरिषदेच्या निवडणूकीत काहीही होऊ शकते. विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल याची मोठी चर्चा कार्यकर्ते करत आहेत. भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी मतदान प्रक्रिया पार पडते ना पडते तोच दीडशे मतांनी माझा विजय आहे’ असे बोलून दाखविले होते. मात्र घोडेबाजार चाललेल्या या निवडणूकीत काहीही होऊ शकते, अशी चर्चा भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत.
गुरूवारी उस्मानाबाद येथे विधानपरिषदेच्या निवडणूकीची मतमोजणी होणार आहे. साधारणत: साडे करा ते बारा वाजे पर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होऊ शकते असे निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या विधानपरिषद निवडणूकीच्या निकालानंतर बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. विशेष करून बीड जिल्ह्यात अधिक राजकीय बदल या निवडणूकीच्या निकालानंतर पहायला मिळणार असल्याने या निवडणूकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.