रोहिंग्य मुस्लिमांसाठी भारताची मदत…
ढाका – म्यानमार मधून बांगलादेशात पळून आलेल्या लक्षावधी रोहिंग्य मुस्लिम निर्वासितांसाठी भारत सरकारने दुसऱ्यांदा मदत पाठवली असून भारतीय नौदलाच्या आयएनएस अविरत मधून पाठवण्यात आलेली ही मदत सामग्री तेथील भारतीय उच्चायुक्त हर्षवर्धन यांच्या मार्फत आपतकालिन मदत खात्याचे मंत्री मोफजल हुसेन चौधरी यांच्याकडे सुपुर्त करण्यात आली. या मदत सामग्रीत 104 टन दूध पावडर, 102 टन सुके मासे, 61 टन बेबी फूड, 50 हजार रेनकोट, आणि गमबुटाच्या 50 हजार जोड्या यांचा त्यात आहे. भारताने पाठवलेली ही दुसरी मदत सामग्री आहे.
आणखी एका जहाजातून दहा लाख लिटर केरोसिन आणि 20 हजार स्टोव्ह पाठवले जात आहेत ती मदतही लवकरच दाखल होईल असे येथील भारतीय सूत्रांकडून सांगण्यात आले. सुमारे साडे सहा लाख रोहिंग्य मुस्लिम तेथे मदत छावण्यात वास्तव्याला असून लवकरच पावसाळा येत असल्याने त्यांना या मदतीची तातडीची गरज आहे. या विस्थापितांमध्ये महिला आणि मुलांची संख्याही मोठी आहे.
रोहिंग्य मुस्लिमांची समस्या सोडवण्यासाठी भारताने म्यानमार वर दबाव टाकावा अशी मागणी बांगला देशाने वारंवार केली आहे. बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी स्वताच ही मागणी भारताकडे केली आहे. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य भारताकडून दिले जाईल अशी ग्वाही भारताचे विदेश सचिव विजय गोखले यांनी नुकतीच दिली आहे.