रेल्वे ट्रॅकवर दारू पिण्यात मग्न असणाऱ्या तळीरामांना चिरडलं, तिघांचा मृत्यू
अमृतसरमध्ये रावण दहनाचा कार्यक्रम पाहताना झालेल्या भीषण अपघातात जवळपास 61 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, दिल्लीच्या नांगलोई रेल्वे स्थानकाजवळ तीन जणांना भरधाव रेल्वेने चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून अद्याप मृतदेहांची ओळख पटलेली नाही. आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार हे तिघे रेल्वे रुळांवर दारू पिण्यास बसले होते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी साडेसातच्या सुमारास बीकानेर-दिल्ली एक्सप्रेसच्या धडकेत या तिघांचा मृत्यू झाला अशी माहिती आहे. रेल्वेच्या मोटरमनने हॉर्न देखील वाजवला पण हे तिघे रुळांवरून बाजूला हटले नाहीत, रेल्वे येत आहे हे त्या तिघांना कळले नसावे अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, तीन जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरू आहे.