राहुल गांधी म्हणजे अडकलेला ग्रामोफोन : मोदी
- त्यांचे बालीश दावे जनता मान्य करणार नाही
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी त्यांच्या सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची खिल्ली उडवली. राहुल म्हणजे अडकलेला ग्रामोफोन आहेत. त्यांचे बालीश दावे जनता मान्य करणार नाही, असे मोदींनी म्हटले.
सध्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांमुळे प्रचाराचा धुरळा उडाला आहे. तर पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक सुमारे सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यापार्श्वभूमीवर, मोदींनी भाजपच्या कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. राहुल त्यांच्या सभांमध्ये संबंधित परिसरात मोबाईलचे उत्पादन करणारे कारखाने सुरू होण्याची गरज व्यक्त करतात. त्यावर काय प्रतिसाद द्यायचा, असा प्रश्न एका कार्यकर्त्याने विचारला. त्यावर राहुल यांचा नामोल्लेख टाळून मोदी उत्तरले, आधीच्या काळात ग्रामोफोन रेकॉर्डस् असायच्या.
कधीकधी त्या अडकून तेच-तेच शब्द वाजवायच्या. तसेच काही लोक आहेत. त्यांच्या मनात एखादी बाब भिनली तर ते त्याचा पुनरूच्चार करत राहतात. तुम्ही त्याची मजा घ्या. त्याचा कुठला ताण घेऊ नका. काळ बदलला असून जनतेला मूर्ख बनवणे सोपे नसल्याची जाणीव त्या लोकांना नाही. बालीश वक्तव्ये कुणीच मान्य करत नाही. तशा वक्तव्यांची जनतेला गंमतच वाटते. भारत हा मोबाईल उत्पादनातील आघाडीचा देश बनला आहे. आम्ही सत्तेवर आलो तेव्हा देशात मोबाईल बनवणारे केवळ 2 कारखाने होते. आता ती संख्या 100 पेक्षा अधिक झाली आहे, असे ते म्हणाले. आमच्या विरोधात कॉंग्रेस नेते करत असलेल्या खोट्या प्रचारातून आमचे यशच अधोरेखित होते, अशी पुस्तीही मोदींनी जोडली.