राजनाथ सिंह यांच्यासाठी २० गावातील वीजपुरवठा १२ तास बंद

भोपाळ : व्हीआयपी संस्कृती संपुष्टात आणण्याचा सरकारनं कितीही प्रयत्न केला तरी वास्तवात तसे चित्र नसल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हेलिकॉप्टरचे सुरक्षित लँडिंग व्हावे यासाठी वीज विभागाने तब्बल १२ तासांपर्यंत २० गावांची वीज बंद ठेवली. बारा तासापर्यंत ही गावे अंधारात होती.
राजनाथ सिंह यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंगसाठी १९ मे सांयकाळी ४ ते २० मे सांयकाळी ६ पर्यंत वीज पुरवठा बंद करण्यात येईल, अशी जाहिरातच जिल्हा प्रशासनानं वृत्तपत्रांमध्ये दिली होती. कारण जेथे हेलिकॉप्टरचे लँडिंग होणार आहे तिथे उच्च दाब क्षमतेच्या दोन वीज वाहिन्या गेल्याचे जाहिरातीत सांगण्यात आले. दरम्यान, अनेक तास वीज बंद ठेवल्यामुळे स्थानिक लोकांनी वीज विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. त्यानंतर रविवारी पहाटे तीनच्या सुमारास पुन्हा एकदा वीज पुरवठा सुरू करण्यात आला. गृहमंत्र्यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रस्तेमार्गानं जाण्याचा पर्याय निवडला. तसेच तात्काळ वीजपुरवठा सुरू करण्यात यावा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले.