यवतमाळच्या शेतकऱ्यांची मोदींविरोधात तक्रार; समस्येकडे दुर्लक्ष
यवतमाळ: यवतमाळ येथील कर्जबाजारी शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि राज्यपाल विद्यासागर राव यांना दोन लाख पत्र पाठविण्याची मोहीम हाती घेतली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार या पत्रांमधून करण्यात आली आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि राज्यपाल विद्यासागर राव यांना १४ एप्रिल रोजी पहिलं पत्र लिहिण्यात आलं आहे. आत्महत्या केलेले यवतमाळचे शेतकरी शंकर चायरे यांच्या कन्या जयश्री चायरे यांनी हे पत्र लिहिलं आहे. शंकर चायरे यांनी राजूरवाडी येथे विष पिऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरले होते.
काँग्रेस नेते आणि शेतकरी न्याय हक्क समितीचे प्रमुख देवानंद पवार यांनी ही पत्र मोहीम सुरू केली आहे. महिन्याभरात दोन लाख पत्रं राष्ट्रपती आणि राज्यपालांना पाठविण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या आत्महत्येला पंतप्रधानांना दोषी धरण्याची ही यवतमाळमधील पहिलीच घटना नाही. तथापि, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याबाबत सरकार असंवेदनशील आहे, असं देवानंद पवार यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चायरे कुटुंबीयांची भेट घेण्यास नकार दिल्यानंतरच आम्ही पत्र लिहिण्याची मोहीम हाती घेतली आहे. राष्ट्रपती आणि राज्यपालांचं लक्ष वेधण्यासाठी पत्र लिहिण्यात येत आहे. तसंच मोदी आणि फडणवीस यांचा शेतकऱ्यांबाबतचा असंवेदनशीलपणाही या पत्रांतून राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून देण्याचा हेतू असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं.