मोदी हे प्रचार पंतप्रधान- चंद्रबाबू नायडूंची टीका
- 2019 मध्ये भाजप सत्तेत राहणार नाही
विजयवाडा – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचार पंतप्रधान आहेत. देशवासियांना दिलेली आश्वासने पाळण्यात त्यांना अपयश आले आहे, अशी टीका आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी केली आहे. 2019 साली होणाऱ्या लोकसभा निवडणूकीनंतर भाजप सत्तेत कायम राहणार नाही, असा विश्वासही नायडू यांनी व्यक्त केला. देशातील स्वतःच्या बळावर पुढील सरकार स्थापन करण्यास कॉंग्रेसलाही यश येणार नाही. तर भाजप नक्कीच सत्तेत नसेल. प्रादेशिक पक्षांकडेच सक्षम आणि नेते आहेत. निवडणूकीनंतर हे नेतेच महत्वाची भूमिका बजावतील, असे नायडू म्हणाले.
कर्नाटकमध्ये एच.डी. कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी समारंभाच्यावेळी विविध प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांसह एकाच मंचावर उपस्थित राहिल्यानंतर थोड्याच दिवसांनी नायडू यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. विजावाडा येथे तेलगू देसम पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या “महानदू’ या वार्षिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. तेलगू देसम पार्टीने भूतकाळामध्ये देशातील समिकरणे बदलली होती, याची त्यांनी आठवण करून दिली. याही वेळी भाजपला रोखण्यात आणि संयुक्त आघाडी निर्माण करण्यात तेलगू देसम पार्टीच महत्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी यावेळी सूचित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचार पंतप्रधान आहेत. ते केवळ घोषणा करतात. मात्र आपल्या आश्वासनांची पूर्तता करत नाहीत. त्यामुळे भाजप पुढील सरकार स्थापन करेल, हे दिवास्वप्नच राहिल, असे नायडू म्हणाले. निवडणूकीच्या काळात मतदान यंत्रांमधील छेडछाड होण्याच्या आरोपांच्या पार्श्वभुमीवर या मतदान यंत्रांच्या वापरासंदर्भात चर्चा होणे आवश्यक आहे, असेही नायडू म्हणाले. भाजप सूडाचे राजकारण करत आहे. सीबीआय आणि ईडी सारख्या संस्थांचा दबावासाठी वापर केला जात आहे, असा आरोपही नायडू यांनी केला.
आंध्रप्रदेशला विशेष दर्जा देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने पाळले नाही. त्यामुळे टीडीपीने “एनडीए’ सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.