मुबलक वीज असल्याने भारनियमन नाही: महावितरण
पुणे – राज्यातील बहुतांश जिल्ह्यांचे कमाल तापमान चाळीस अंशांच्या आसपास पोचले आहे. परिणामी, पंखे, कूलर अशा वस्तूंची मागणीही वाढली आहे. मात्र विजेची टंचाई भासेल, अशी परिस्थिती राज्यात नाही. मागणीनुसार मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध करण्याची सोय केली असल्याने, राज्यात कोठेही भारनियमन होणार नाही, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
हवामानातील बदलामुळे राज्याचा बहुतांश भाग उन्हाच्या चटक्यांनी होरपळून निघत आहे. साहजिकच मागील आठवड्याच्या तुलनेत विजेची मागणी वाढत आहे. दररोजच या मागणीत वाढच होत असल्याचे निरीक्षण महावितरणने नोंदविले असून, रविवारी (ता. 16) राज्यात 20,933 मेगावॉट विजेची मागणी होती. त्या तुलनेत मुंबई विभागात फक्त 2376 मेगावॉटची गरज नोंदली गेली. मात्र दहा ते 14 एप्रिल दरम्यान, मुंबईचे कमाल तापमान वाढल्याने मुंबईकरांना उन्हाळा असह्य झाला होता. त्या वेळी तीन हजार ते 3100 मेगावॉट वीजदेखील महावितरणकडून पुरविण्यात येत होती. आजमितीला पुणे परिमंडल क्षेत्रासाठी अकराशे ते बाराशे मेगावॉट विजेची गरज आहे. त्यानुसार विजेचा पुरवठा करण्यात येत आहे. पुरवठा करूनही पुष्कळशी वीज शिल्लक राहत आहे, असेही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, महावितरणने काही कंपन्यांसोबत दीर्घ मुदतीचे वीज खरेदी करार केले आहेत, त्यामुळे विजेचा पुरवठा मुबलक आहे.
याबाबत महावितरणच्या मुख्यालयाचे जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील म्हणाले, “”महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांच्या नियोजनानुसार पुरेशी वीज उपलब्ध होऊ लागली आहे. कमाल तापमान वाढल्याने विजेची मागणी वाढली आहे.”