भाजपला मतदान करु नका, 600 कलाकारांचं पत्र लिहून आवाहन

मुंबई – अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यासह विविध 600 पेक्षा जास्त कलाकारांनी भाजपला मत न देण्याचं आवाहन केलंय. या सर्व कलाकारांनी एक पत्र लिहून जनतेला आवाहन केलंय, मतदानाच्या माध्यमातून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाला सत्तेपासून दूर ठेवा. हे आवाहन करणाऱ्या अभिनेत्यांमध्य अमोल पालेकर, नसीरुद्दीन शाह, गिरीश कर्नाड, एमके रैना आणि उषा गांगुली यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, भारत आणि संविधान धोक्यात असल्याचं या कलाकारांचं म्हणणं आहे. हे पत्र 12 भाषांमध्ये तयार करुन आर्टिस्ट युनायटेड इंडिया वेबसाईटवर टाकण्यात आलंय.
काय आहे पत्रात?
“आगामी लोकसभा निवडणूक ही देशातील सर्वात गंभीर निवडणूक आहे. आज गीत, नृत्य, हास्य धोक्यात आहे. आपलं संविधान धोक्यात आहे. जिथे तर्क, वितर्क आणि चर्चा होतात अशा संस्थांचा सरकारने गळा दाबलाय. एखाद्या लोकशाहीला सर्वात कमकुवत आणि सर्वात वंचित लोकच बळकट बनवू शकतात. कोणतीच लोकशाही प्रश्नाविना, चर्चेविना आणि मजबूत विरोधकांशिवाय चालू शकत नाही. या सर्वच गोष्टी सध्याच्या सरकारने पायदळी तुडवल्या आहेत. सर्व जण भाजपला सत्तेतून बाहेर करण्यासाठी मतदान करा. संविधानाचं संरक्षण करा आणि कट्टरता, घृणा आणि निष्ठुरतेला सत्तेतून बाहेर करा”, असा मजकूर या पत्रात आहे.
या पत्रावर शांता गोखले, महेश एलकुंचेवार, महेश दत्तानी, अरुंधती नाग, कीर्ती जैन, अभिषेक मुजूमदार, कोंकणा सेन शर्मा, रत्ना पाठक शाह, ललित दुबे, मीता वशिष्ठ, मकरंद देशपांडे आणि अनुराग कश्यप यांची स्वाक्षरी आहे.
दरम्यान, यापूर्वी 100 पेक्षा जास्त सिनेनिर्मात्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान न करण्याचं आवाहन केलं होतं. काही वृत्तांनुसार, यामध्ये मल्याळम दिग्दर्शक आशिक अबू, आनंद पटवर्धन, सुदेवन, दीपा धनराज, गुरविंदर सिंह, पुष्पेंद्र सिंह यांची नावं होती.