भाजपने जनतेला महागाई, बेरोजगारीच्या खाईत लोटले

- कैलास कदम : कामगार कायद्यातील बदलास विरोध
पिंपरी – भाजप सरकारने मागील चार वर्षात कामगार कायद्यात अनेक अन्यायकारक बदल केले. कामगारांना देशोधडीला लावतानाच देशभरातील जनतेला महागाई व बेराजगारीच्या खाईत लोटले, अशी टीका कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष कैलास कदम यांनी पत्रकार परिषदेत केली.
कामगार कायद्यातील प्रस्तावित बदलाविरोधात कामगार संघटना संयुक्त कृती समिती जनजागृती करणार आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत कैलास कदम बोलत होते. यावेळी कामगार नेते अजित अभ्यंकर, माधव रोहम, ऍड. राम शरमाळे, नारायण जोशी, किरण मोघे, ऍड. म. वि. अकोलकर, वसंत पवार, शशिकांत धुमाळ, अनुराधा आठवले, पी. एस. शिंदे, व्ही. व्ही. कदम, प्रशांत माळवदे, चंद्रकांत तिवारी, विश्वास जाधव, चंद्रकांत कदम, सुभेंद्र भांडारकर, समीर धुमाळ, सुनिल देसाई, सोपान भोसले, रधुनाथ ससाणे, राजेंद्र खराडे आदी उपस्थित होते.
कदम पुढे म्हणाले की, केंद्र व राज्य सरकार भांडवलदारांना पूरक धोरण राबवत आहे. त्यामुळे मागील चार वर्षात रोजगारात घट झाली. त्याचा परिणाम देशाच्या विकास दरावर झाला. सर्वच क्षेत्रातील कामगार अस्थिर आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकार, सर्व महामंडळ, केंद्र सरकार व त्यांच्या अंगीकृत संस्था, उपक्रम व संरक्षण क्षेत्रात देखील खासगी उद्योगाप्रमाणे ठेकेदारी कामगारांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे.
शासन देखील ठेकेदारांना पूरकच धोरण राबवत आहे. यामुळे कामगार कायम कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक असुरक्षिततेच्या छायेखाली जगत आहे. कामगारांच्या हक्कांसाठी, कामगारांमध्ये जनजागृती करण्यासाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने चिंचवड मधील ऍटो क्लस्टरच्या सभागृहात सोमवारी (दि. 28) दुपारी तीन वाजता कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात डॉ. डी. एल. कराड, शाम काळे, ऍड. म. वि. अकोलकर, अजित अभ्यंकर, अरविंद श्रोत्री आदी मार्गदर्शन करणार असल्याचे कैलास कदम यांनी सांगितले.