भाजपच्या पापातून मुक्त होणार – नगरसेवक बाळासाहेब आेव्हाळ
पिंपरी- भाजपच्या राजवटीत देशात दलितांवर होणारे अन्याय, अॅट्रासिटी कायद्यात केलेली शिथिलथा आणि भिमा कोरेगांवमध्ये दलितावर केलेल्या दगड फेकीतील आरोपी अद्याप मोकाट फिरत आहेत. यासह विविध प्रश्नावर पिंपरी-चिंचवड नगरसेवक बाळासाहेब आेव्हाळ यांनी भाजपच्या राजकारणापासून अलिप्त होवून त्याच्या पापातून मुक्त होणार असल्याची घोषणा आज (मंगळवारी) पत्रकार परिषदेत केली.
ओव्हाळ पुढे म्हणाले की, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल आणि उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश यासह अनेक राज्यात दलितांवरील अन्यायाच्या घटना वाढल्या आहेत. देशात एकात्मतेला धोका असून नागरिकांमध्ये असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे. अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करत त्यातील दोन मुद्दे शिथिल करण्यात आले आहेत. देशात दलित व बहुजन समाजातील नागरिकांवर अन्याय वाढला आहे. तो कमी करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील दलित समाजाच्या लोकांच्या पदोन्नत्या शासनामध्ये रखडल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. शहरातील महत्त्वाचा कच-याचा प्रश्न भाजपला सोडविता आलेला नाही. अधिका-यांना वारंवार सूचना देऊन सांगून देखील कच-याच्या समस्येकडे लक्ष दिले जात नाही. या मुद्द्यामुळे मी भाजपपासून या पुढील राजकीय कारकीर्दीत अलिप्त राहणार आहे. भाजपची विचारसरणी व धोरणाच्या आपण विरोधात आहोत. पक्षातील कोणत्याही व्यक्ती किंवा नेत्याच्या विरोधात नाही. पक्षाने शिस्तभंगाची कारवाई केल्यास होणारे परिणाम भोगण्यासाठी तयार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.