बुलेट ट्रेनविरोधात शिवसेना आक्रमक

- 70 गावांमधून काढणार “संघर्ष यात्रा’
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला असलेला विरोध शिवसेना अधिक आक्रमक करणार आहे. या प्रकल्पाला तिव्र विरोध दर्शविण्यासाठी शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे संघर्ष यात्रा काढणार आहेत.
विधान भवन, लोकसभा यांच्याइतकीच ग्रामसभा महत्त्वाची आहे. ग्रामसभेने बुलेट ट्रेन नको असल्याचे प्रस्ताव मंजूर केलेत. आता हे प्रस्ताव दिल्ली आणि पावसाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे निलम गोऱ्हे यांनी सांगितले आहे.
ज्या 70 गावांनी बुलेट ट्रेनला विरोध केला आहे, त्याच गावांमधून आपण संघर्ष यात्रा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बुलेट ट्रेनविरोधाची दिशा ठरवण्यासाठी पालघरमध्ये आज बैठक बोलावण्यात आली होती. ज्यात गोऱ्हे यांच्यासह कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.
दरम्यान, पालघरमधील पोटनिवडणूकीतही या मुद्द्यावरून सत्तेत सहभागी असलेल्या भाजप आणि मित्रपक्ष शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले होते. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला शिवसेनेने सुरूवातीपासूनच विरोध दर्शविला असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही याबाबत जाहीर वक्तव्य केली आहेत.