‘बिर्ला आणि अंबानी यांच्या उद्योगांसाठीच अवनी वाघिणीची शिकार’
अवनी वाघिणीची शिकार झाल्यानंतर त्यावर विविध स्तरातून टीका होताना दिसते आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या संदर्भात एक गंभीर आरोप केला आहे. बिर्ला आणि अंबानी यांच्या उद्योगांसाठीच अवनी वाघिणीची शिकार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वन्य कायद्यानुसार एखादा वन्य प्राणी हिंसक झाला तर त्याला बेशुद्ध करून पकडणं असा नियम आहे. अवनीच्या बाबतीत मात्र सगळे नियम धाब्यावर बसवण्यात आले. अवनीला बेशुद्ध करण्याऐवजी थेट ठार करण्यात आलं ही बाब निषेधार्ह आहे असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच उद्योगपतींच्या फायद्यासाठी तिची शिकार केल्याचा आरोप त्यांनी केला.
वन विभागाला हिंसक झालेली वाघीण दिसत होती, मात्र वन क्षेत्रात होणारी लाकूड चोरी आणि प्राण्यांच्या अवशेषांची चोरी होते त्याचे काय? असाही प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे आरोप केले आहेत. अंबानी आणि बिर्ला यांच्या फायद्यासाठीच या वाघिणीची शिकार करण्यात आली. या शिकारीचा जाब आम्ही वन्य अधिकारी आणि वन मंत्र्याना विचारल्याशिवाय शांत बसणार नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
यवतमाळ येथील पांढकवडा वन विभागात अवनी या वाघिणीने दहशत माजवली होती. या वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. पाच शार्प शुटर, तीन मोठे पिंजरे, ५०० वन कर्मचारी आणि खासगी कर्मचाऱ्यांची फौज या ठिकाणी होती. वाघिणीचा शोध घेण्यासाठी पॅरामिटर आणि इटालियन कुत्रेही आणण्यात आले होते. असे असले तरीही या वाघिणीला पकडण्यात आले नव्हते. अखेर तिचा शुक्रवारी खात्मा करण्यात आला ज्यानंतर सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका होताना दिसते आहे. तसेच आता तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अवनीला उद्योगपतींच्या फायद्यासाठी ठार केले गेल्याचे म्हटले आहे.