breaking-newsक्रिडा

फिरकी समोर विराट कोहली फेल ठरला

बंगळुरू – विराट कोहली म्हणजे “रन मशिन’ पण सध्याच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या फलंदाजीला फिरकीचे ग्रहण लागले असून फिरकी गोलंदाजांसमोर तो एक नाही दोन नाही तर तब्बल 8 वेळा बाद झाल्याने आयपीएलच्या या हंगामात फिरकी समोर विराट कोहली फेल ठरला.सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कोहली रशिद खानच्या गुगलीवर तसेच राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात कृष्णप्पा गौतमच्या फिरकीवर ज्यापद्धतीने तो “बोल्ड’ झाला ते त्याच्या लौकिकाला साजेसं नव्हतं. जगातील भल्याभल्या गोलंदाजांच्या उरात धडकी भरवणारा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली सध्या फिरकीपटूंच्या माऱ्यापुढं अडखळताना दिसत आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात वेगवेगळ्या संघाच्या फिरकीपटूंनी एक-दोनदा नव्हे तर आठ वेळा विराटला तंबूचा रस्ता दाखवलाय. त्यामुळं भारतीय संघात चिंतेचं वातावरण आहे.

आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 13 सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये विराट नाबाद राहिलाय. तर, दहावेळा बाद झाला आहे. त्यातील आठ वेळा त्याचा बळी फिरकी गोलंदाजांनी घेतला आहे. हैदराबाद विरुद्ध नुकत्याच झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानचा स्पिनर राशिद खानने विराट कोहलीला क्‍लीन बोल्ड केलं. या सामन्यातील पॉवर प्लेमध्ये जास्तीजास्त धावा काढण्याचा विराटचा प्रयत्न होता. मात्र, राशिदच्या जादुई स्पिनने विराटची धावांची घोडदौड रोखली. आयपीएलमध्ये विराटने यावर्षी 52.60च्या सरासरीनं 530 धावा काढल्या आहेत. विराट शिवाय रॉबिन उथ्थपा, सुनील नरेन, जोस बटलर आणि ऋषभ पंत हे फलंदाज देखील तीन ते चारवेळा फिरकी गोलंदाजीचे शिकार झाले आहेत. कोहलीला राजस्थान चिरुद्धच्या सामन्यात 9 चेंडूंत फक्त 4 धावाच करता आल्या. यावेळी कोहली ज्यापद्धतीने बाद झाला ते त्याच्या चाहत्यांना नक्कीच आवडलेलं नसेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button