पुरस्कार मनोबल, धैर्य वाढवून प्रेरणा देतात – अभिनेता विजय कदम यांचे मत
- अण्णासाहेब मगर सोशल स्पोर्टस फाऊंडेशनतर्फे विविध पुरस्कारांचे वितरण
पिंपरी – कोणत्याही क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करणा-या व्यक्तींसाठी एखादा पुरस्कार हा फक्त सन्मान नसतो. पुरस्कारामुळे त्या व्यक्तींचे मनोबल, धैर्य वाढवून जीवनाला प्रेरणा देतात, असे मत प्रसिद्ध सिने अभिनेते विजय कदम यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.
चिंचवडच्या उद्योगनगर येथील कामगार कल्याण मैदान येथे रविवारी (दि. 27) अण्णासाहेब मगर सोशल स्पोर्टस् फाऊंडेशनच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. या वर्षीचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ माजी खासदार गजानन बाबर यांना सपत्नीक प्रदान करण्यात आला. त्यांच्याबरोबर मदन वाघमारे (उद्योगभूषण), विनायक भोंगाळे (पिंपरी-चिंचवड भूषण), अशोक भुजबळ (सहकार भूषण), राजेंद्र गोरे (युवा भूषण), ज्ञानेश्वर बिजले (उत्कृष्ट वार्ताहर), महेंद्र ठाकूर (उत्कृष्ठ आर्किटेक्ट) यांना विशेष कार्यगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी उद्योगपती ध्रुवशेठ कानपिळे, अण्णासाहेब मगर सोशल स्पोर्टस फाउंडेशनचे गुलाब बिरदवडे आदी उपस्थित होते.
कदम म्हणाले की, व्यक्तीला मिळालेल्या पुरस्कारामुळे समाजात चांगल्या गोष्टीचा पायंडा पाडला जातो. स्वतःच्या कष्टामुळे व कौशल्यामुळे मिळालेला पुरस्कार म्हणजे समाजाकडून पाठीवर मिळालेली थाप आहे. तसेच, इतरांच्या मनात त्यापासून उर्मी निर्माण होते. काम करण्याची आत्मशक्ती आणखी वाढते. हाच जीवनाचा खरा आदर्श आहे. यावेळी मंगेश पाडगावकर यांची कविता सादर करून मनोगताचा शेवट केला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात ज्ञानेश्वर माने (आदर्श वस्ताद), विष्णू बनकर (अभियंता भूषण), कविता कडू-पाटील (शैक्षणिक भूषण), निलेश फंड, संभाजी शितोळे (सामाजिक कार्यकर्ता), योगेश एंटरप्रायजेस (बांधकाम भूषण), अमृता नवले (महिला भूषण), मनोज सेठिया (प्रशासकीय भूषण), प्राजक्ता रुद्रवार (महिला भूषण), अमर ताजणे (युवा उद्योजक), प्रदीप बोरसे (कामगार कल्याण अधिकारी), अॅड. संतोष ढोकले (अॅडव्होकेट), वैशाली खराडे (महिला भूषण), रमेश शेट्टी (कला गौरव), नंदु घुले (कुस्तीपटू), मंगला जाधव (महिला भूषण), आदर्श कॉम्प्यूटर्स (उत्कृष्ट कॉम्प्यूटर) यांना देखील कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बाल गायिका मिथिला माळी व हर्ष भावसार यांचा लिटिल वंडर्स ऑर्केस्ट्रा यांच्या गाण्याचा आनंद प्रेक्षकांनी घेतला.
गुलाब बिरदवडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन संजय भुजबळ, नेहा चौधरी, संगीता व्होरा, ज्योती सोनार, रमेश राऊत, सुषमा वैद्य, कैलास माळी आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.