breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पुण्यावरचे जलसंकट टळणार?

मुख्यमंत्र्यांची शिष्टाई : आवश्‍यक पाणीपुरवठ्याच्या सूचना

पुणे – शहराच्या पाणी कोट्यावरून महापालिका आणि जलसंपदा विभागात सुरू असलेल्या वादावर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच शिष्टाई केली आहे. महापौर आणि प्रशासनाच्या विनंतीनुसार, “तुर्तास पुणे शहरास आवश्‍यक पाण्यात कोणतीही कपात करू नका,’ अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलसंपदा विभागास दिल्या आहेत. त्यामुळे मन:स्ताप सहन करणाऱ्या पुणेकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे.

येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे पुण्यात येणार असून पाणी प्रश्‍नाबाबत त्यांनी बैठकही बोलवल्याची माहिती महापालिकेतील प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. कालवा समिती बैठकीत शहराला 1,350 ऐवजी 1,150 एमएलडी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पाटबंधारे विभागाने खडकवासला धरणावर जात पाणी पुरवठ्याचे पंप पोलीस बंदोबस्तात बंद केले. त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. त्यानंतरही जादा पाणी सोडण्यास पाटबंधारे विभागाने नकार दिल्याने महापालिकेने अखेर पाणीकपातीचा निर्णय घेतला. त्यातच विस्कळीत पाणी पुरवठ्याचे पडसाद मुख्यसभेतही उमटत असून भाजप नगरसेवकच पाण्यासाठी आंदोलने करत आहेत. त्यामुळे भाजपचीही चांगलीच कोंडी झाली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नागपूर येथे महापौर परिषदेसाठी गेलेल्या मुक्ता टिळक यांनी ही बाब थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्दशनास आणून दिली. त्यावर पुण्यातील पाणी-बाणीची दखल थेट मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेत आयुक्तांकडूनही पाण्याच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी “पुणे शहरासाठी आवश्‍यक पाण्यात कोणतीही कपात करू नका,’ अशा सूचनाच जलसंपदा विभागास दिल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून स्पष्ट केले. त्यामुळे गळती गृहित धरून शहरासाठी आवश्‍यक असलेले पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून पुणे शहरासाठी पुरेसे पाणी मिळेल, असा दावा प्रशासनाने केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button