‘पाहुण्यांना बोलवून त्यांचा अपमान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही’- प्रसाद ओक
नवी दिल्ली : ‘घरी पाहुण्यांना बोलवून त्यांचा अपमान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. तसंच एखाद्याच्या घरी जाऊन त्याचा अपमान करणे हे ही आपले संस्कार नाही.’ असे म्हणत अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक याने ६५व्या राष्ट्रीय पुरस्कार वितरणाबाबत घडलेल्या प्रकाराबाबत निषेध नोंदवला आहे.
अभिनेता प्रसाद ओकच्या कच्चा लिंबू चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला होता. या पुरस्काराचं वितरण काल नवी दिल्लीत पार पडलं. यावेळी प्रसाद ओकने माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.
राष्ट्रीय पुरस्कार हा राष्ट्रपतींच्या हस्ते मिळणे, कलाकारांसाठी सन्मानाची बाब असते. मात्र ठराविक लोकांना हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळेल आणि उर्वरित पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्र्यांच्या हस्ते मिळतील, असे सांगण्यात आले. त्यानंतर सिनेसृष्टीतून या बाबत मिश्र प्रतिक्रियाही उमटल्या. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळणार नसेल, तर आम्ही पुरस्कार सोहळ्याला येणारच नाही, असे पुरस्कार विजेत्यांनी सांगितले आणि त्यानुसार या सोहळ्यावर बहिष्कार टाकला.
या सर्व प्रकारानंतर प्रसाद ओकने ट्वीटरवरुन आपला निषेध व्यक्त केला. ‘आम्ही कच्चा लिंबूच्या टीमच्या वतीने “राष्ट्रीय पुरस्कार” स्वीकारला आहे. जे झालं त्याचा निषेध आहेच पण पुरस्काराचा आनंद जास्त मोठ्ठा आहे.’ असे ट्वीट त्याने केलं आहे.