पाणी कपातीबाबत लवकरच गटनेत्यांची बैठक- महापौर काळजे
पिंपरी: पाणी कपातीचे धोरण निश्चित करण्यात आलेले नाही. याबाबत लवकरच गटनेते आणि अधिका-यांची बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर पाणी कपातीबाबत निर्णय घेण्यात येणार, असल्याचे महापौर नितीन काळजे यांनी पत्रकांराशी बोलताना सांगितले.
पवना धरणात 40.79 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा मुबलक असला तरीही पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. पवना धरणातून पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्यातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. गेल्यावर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे यंदा एप्रिलमध्येही धरणात मुबलक पाणीसाठा आहे.
एप्रिल अर्धा आणि मे हे दोन महिने जायचे आहेत. जून महिन्यात पाऊसाने ओढ दिल्यावर पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनाकडून शहरातील नागरिकांना एकवेळेस पाणी पुरवठा करण्याबाबत हालचाली सुरू आहेत.
गटनेत्यांची वेळ घेऊन लवकरच एक बैठक घेण्यात येणार आहे. त्यामध्ये पाणी कपात किती करायची, एकवेळ करायचे की दिवसाड करायचे याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे, महापौर काळजे यांनी सांगितले.