पाकिस्तानकडून सेल्फ डिटरमिनेशन आधिकाराचा गैरवापर
संयुक्तराष्ट्रे – संयुक्तराष्ट्रांच्या आमसभेत काश्मीरचा विषय उपस्थित करण्याच्या पाकिस्तानच्या कृतीवर भारताने जोरदार आक्षेप घेतला असून पाकिस्तानने संयुक्तराष्ट्रांच्या व्यासपीठाचा कायमच आपल्या संकुचित राजकीय लाभासाठी दुरूपयोग केला आहे असे म्हटले आहे. सेल्फ डिटरमिनेशन अधिकाराचा वापरून करून दुसऱ्या राष्ट्राच्या प्रादेशिक एकात्मतेला कमी लेखता येणार नाही असे भारताने पाकला बजावले आहे.
भारताच्या संयुक्तराष्ट्रांतील प्रतिनिधी पौलोमी त्रिपाठी यांनी पाकिस्तानच्या दूत मलिहा लोधी यांच्या वक्तव्याला आक्षेप घेताना हे प्रतिपादन केले आहे. काश्मीरी जनतेच्या आत्मसन्मानाकडे भारताने गेली अनेक दशके दुर्लक्षित ठेवले आहे असे त्यांनी म्हटले होते. काश्मीर प्रश्नाची समाधानकारक सोडवणूक होईपर्यंत संयुक्तराष्ट्रांच्या कार्यक्रम पत्रिकेवर हा विषय कायम राहील असेही त्यांनी म्हटले आहे. त्याला प्रत्त्युत्तर देताना पौलोमी त्रिपाठी यांनी म्हटले आहे की पाकिस्तानने जम्मू काश्मीर या भारताचा अविभाज्य अंग असलेल्या राज्याच्या विषयात हस्तक्षेप करण्याचा जो प्रयत्न केला आहे तो आम्ही अमान्य करीत आहोत. संयुक्तराष्ट्रांच्या व्यासपीठाचा संकुचित राजकीय कारणासाठी दुरूपयोग करण्याची पाकिस्तानला सवयच जडली आहे.