breaking-newsपुणे
पसायदान भारतीय संस्कृतीचे खरे गमक – सद्गुरू बाळ महाराज
निगडी- ज्ञानेश्वराचे पसायदान हे भारतीय संस्कृतीचे खरे गमक असून संताचे हेच तत्त्वज्ञान माणसाला माणूस पण शिकविते, ज्ञानेश्वरांचे हे पसायदान छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि पुढे क्रांतीकारकांनी अंमलात आणले, असे प्रतिपादन बाळ महाराज यांनी व्यक्त केले. पसायदान ते वंदे मातरम या विषयावर वसंत व्याख्यान मालेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपकार्यवाह शरद इनामदार, नगरसदस्या सुमनताई पवळे, कमलताई घोलप, विजयराव देशपांडे, धनाजी शिंदे, नितिन वाटकर, नंदकुमार कुलकर्णी उपस्थित होते.
बाळ महाराज म्हणाले की, देवगिरीतील भारतीय भगवा ध्वज खाली उतरल्यानंतर महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वरांनी अठरापगड जातीच्या लोकांमध्ये सत्संगातून क्रांतीची बीजे रोवली. पंढरीच्या वाळवंटी त्यांनी भगवा ध्वज सर्वांच्या हातात दिला. ती परंपरा आजही वारकरी पुढे चालवत आहे. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस ! या नुसार पुढे संत नामदेव, एकनाथ महाराजांचे कार्य तसेच जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी धर्मासाठी स्वराज्य निर्माण केले. ज्ञानेश्वरांचे पसायदान जगाला तत्वज्ञान शिकविते. या पसायदानाच्या प्रत्येक ओवीतून पुढे भारतीय स्वातंत्र्यासाठी जीवन समर्पित करणारे क्रांतीकारक निर्माण झाले. वंदे मातरम् या जय घोषातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण वारके यांनी केले. तर अपर्णा घोलप यांनी आभार मानले.