नोटबंदी, जीएसटीचा पतंजलीला फटका
हरिद्वार – मोदी सरकारच्या नोटबंदी आणि जीएसटीमुळे आमच्या पतंजली उद्योग समुहाचे मोठेच नुकसान झाले असून आमची विक्री वाढ पुर्णपणे थंडावली असल्याचे या उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक असलेले आचार्य बालकृष्ण यांनी म्हटले आहे. आचार्य बालकृष्ण हे बाबा रामदेव यांचे उजवे हात समजले जातात. स्वता बाबा रामदेव यांनी काळ्यापैशाच्या विरोधात नोटबंदीच्या निर्णयाचे सुरूवातीला स्वागत केले होते पण आज त्यांच्याच उद्योग समुहाला नोटबंदी आणि त्या पाठोपाठ लागू करण्यात आलेल्या जीएसटीचा मोठा फटका बसला आहे. आणि स्वता बालकृष्ण यांनीच ही बाब जाहीरपणे नमूद केल्याने त्याला विशेष महत्व आहे.
ते म्हणाले की मागच्या आर्थिक वर्षात आमची जेवढी उलाढाल झाली तेवढीच यंदा झाली आहे त्यात कोणतीही वाढ झालेली दिसली नाही. हा जीएसटी आणि नोटबंदीचाच परिणाम आहे. सुरूवातीच्या काही वर्षात पतंजलीच्या उत्पादनांनी बाजारात मोठीच धूम उडवली होती. दरवर्षी या उद्योग समुहाची विक्री दुप्पट वेगाने वाढत होती. याच वेगाने आम्ही वार्षिक 20 हजार कोटी रूपयांच्या व्यवसायाचा टप्पा पार करू असे रामदेवबाबांनी म्हटले आहे पण त्यांच्या उत्पादन विक्रीला मात्र आता मर्यादा आल्या आहेत. याचे खापर त्यांनी नोटबंदीवर फोडले आहे. दरम्यान मुंबईतील कॅपिटल मार्केटचे एक तज्ज्ञ सचीन बोबडे यांनी मात्र वेगळाच दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की पतंजली उत्पादनांच्या दर्जा विषयी वादंग निर्माण झाल्याने त्यांच्या व्यवसाय वाढीवर मर्यादा आल्या आहेत. त्यांच्याकडे विक्री व्यवस्थेचे व्यवस्थीत नेटवर्कही नाही. त्यामुळे त्यांच्या वाढीची क्षमताच आता संपली आहे असे त्यांनी म्हटले आहे.