नाणारवासीयांच्या संघर्षांला राहुल गांधींचा पाठिंबा
मुंबई- नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाविरोधात संघर्ष करणाऱ्या ग्रामस्थांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे. ग्रामस्थांच्या प्रखर संघर्षांबद्दल सहानुभूती व्यक्त करीत सुपीक व भरपूर उत्पन्न देणाऱ्या जमिनी या प्रकल्पासाठी घेण्यास त्यांनी विरोध दर्शविला.
नाणार रिफायनरी विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमवेत दिल्ली येथे शनिवारी गांधी यांची भेट घेतली. अध्यक्षांनी या प्रकल्पाला होणाऱ्या विरोधाची आणि कारणांची सखोल माहिती घेतली. प्रकल्प विरोधी कृती समितीचे अध्यक्ष अशोक वालम व इतर सदस्यांनी याबद्दलची पाश्र्वभूमी स्पष्ट करताना या गावात जवळपास आंबे, काजू, नारळ, सुपारी, साग, बांबू इत्यादींची सहा कोटी झाडे असून सभोवती पश्चिम घाटाचा भागदेखील येतो हे सांगितले. त्यावर राहुल गांधी यांनी अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्याची सूचना केली. त्यानुसार चव्हाण २ मे रोजी नाणार येथे जाणार आहेत.