नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी भाजप प्रयत्नशिल – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला

पिंपरी – भाजपाचे सरकार गोरगरींबाच्या कल्याणासाठी काम करीत आहे. नागरिकांच्या व्यवसायांसाठी अर्थसहाय्य करण्याच्या सूचना अर्थ मंत्रालयाने बँकाना दिल्या आहेत. त्यानूसार मुद्रा योजनेचा 13 कोटी नागरिकांना लाभ झाला आहे. याकरिता सरकारने बँकांना तब्बल दोन लाख कोटी रुपये दिले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंगांना ‘दिव्यांग’ नागरिक म्हणून संबोधण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील असल्याचे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सहकार मंत्रालयाच्या सहयोगाने व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील 311 दिव्यांगांना आज (शुक्रवारी) शुक्ला यांच्या हस्ते कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे मोफत वाटप तसेच राष्ट्रीयकृत बँकांच्या वतीने मुद्रा लोनबाबत माहिती व अर्ज वाटप करण्यात आले. महापालिकेच्या पेन्शन योजनेच्या अर्ज वाटपाला देखील सुरुवात करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
आकुर्डी येथील साई उद्यानात झालेल्या कार्यक्रमाला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, भाजपच्या प्रदेशच्या नेत्या उमा खापरे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, सदाशिव खाडे, पालिकेचे प्रभारी आयुक्त किरण गित्ते, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, प्रवीण अष्टीकर, सहायक आयुक्त स्मिता झगडे आदी उपस्थित होते.
शुक्ला म्हणाले, भाजप सरकारने चार वर्षात देशाचा गौरव वाढविला. जगात भारताचे नाव अभिमाने घेतले जाते. पंतप्रधान मोदी यांनी जगभरात भारताची प्रतिमा उंचाविली आहे. विरोधात असताना ज्या अमेरिकेने पंतप्रधान मोदी यांना ‘व्हिसा’ नाकारला होता. त्याच अमेरिकेने पंतप्रधानांना अमेरिकेला भेट देण्याचे निमंत्रण दिले. तेही चार वेळेस निमंत्रण दिले. त्यानंतर मोदी यांनी अमेरिकेला भेट दिली. देशाचे पैसे घेऊन काही लोक पळून गेले. परंतु, या लोकांना भाजप सरकारच्या नव्हे तर युपीए सरकारच्या राजवटीत पैसे दिले गेले आहेत. हे सगळे युपीए सरकारचे पाप असून आजही आम्ही ते धुण्याचे काम करत आहोत, असेही ते म्हणाले.
खासदार अमर साबळे म्हणाले, ”दिव्यांगांचे जीवन सुखी करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. या कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनाने दिव्यांगाना मोठा आनंद होईल. अपंगत्व येऊन देखील दिव्यांग नागरिक आनंदाने आयुष्य जगत आहेत. अपंगत्वार मात करुन जगण्याची त्यांची जिद्द वाखनण्याजोगी आहे. ज्याची पत नाही. त्याची पत निर्माण करण्यासाठी बँकेच्या अधिका-यांनी मदत करावी”.