breaking-newsराष्ट्रिय
धुळीच्या वादळाचे थैमान, दोन दिवसांत मृत्युुमुखी पडलेल्यांची संख्या 124
नवी दिल्ली -उत्तरप्रदेश आणि राजस्थानसह पाच राज्यांमध्ये मागील दोन दिवस धुळीच्या वादळाने थैमान घातले. वादळाबरोबरच वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये 124 जण मृत्युमुखी पडले, तर सुमारे 400 जखमी झाले.
केंद्रीय गृह मंत्रालयाने आज वादळामुळे झालेल्या जीवितहानीची माहिती दिली. उत्तरप्रदेशात सर्वांधिक 73 जण मृत्युमुखी पडले, तर 91 जखमी झाले. त्याखालोखाल राजस्थानात 35 जणांचा मृत्यू झाला, तर 206 जण जखमी झाले. तेलंगणात 8, उत्तराखंडमध्ये 6 तर पंजाबमध्ये दोघे दगावले. या तीन राज्यांत जवळपास 100 जण जखमी झाले.
वादळामुळे संबंधित राज्यांमध्ये झाडे आणि वीजेचे खांब कोसळण्याच्या घटना घडून बऱ्याच भागांचा वीजपुरवठा खंडीत झाला. दरम्यान, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बिहार या चार राज्यांना वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवणारा इशारा नव्याने देण्यात आला आहे. इतर काही राज्यांच्या दुर्गम भागांतही वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तामीळनाडू, केरळसारख्या राज्यांत मुसळधार पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.