धक्कादायक ! रोहिंग्यांच्या सशस्त्र गटाने केली हिंदूंची हत्या
सॅन फ्रॅन्सिस्को : म्यानमार लष्कर आणि रोहिंग्या यांच्यात झालेल्या तणावामुळे बांगलादेश व म्यानमारमध्ये मोठी समस्या निर्माण झाली आहे. म्यानमारच्या सशस्त्र दलांकडून रखाइन प्रांतामध्ये रोहिंग्यांवर अत्याचार झाले असे सांगण्यात येत असले तरी आता अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालातून नवी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे सोमवारी उघड झालेल्या एका घटनेमध्ये बांगलादेशातून रोहिंग्या मणिपूरमध्ये येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. इंफाळमध्ये पोलिसांनी 8 रोहिंग्यांना पकडले असून त्यांच्याकडे बनावट आधारकार्डही होते.
अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मी या रोहिंग्यांच्या सशस्त्र गटाने सुमारे 99 हिंदू पुरुष-महिला आणि मुलांची हत्या केल्याचे अॅम्नेस्टीने स्पष्ट केले आहे. अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीने केलेल्या हत्या व अत्याचारांकडे दुर्लक्ष करणे अवघड आहे. या हल्ल्यांमधून वाचलेल्या लोकांवर या घटनांचा अत्यंत खोलवर परिणाम झालेला आहे. असे अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या तिराना हसन यांनी सांगितले.
म्यानमारमध्ये रोहिंग्यांच्या बंडखोरांनी पोलिसांच्या चौक्यांवर हल्ले केल्यानंतर म्यानमार लष्कराने रोहिंग्यांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेचे म्यानमार सरकारने समर्थनही केले होते. या मोहिमेत हजारो निरपराधांवर अत्याचार, बलात्कार करण्यात आले. हजारो रोहिंग्यांची घरे जाळण्यात आली तर लक्षावधी रोहिंग्यांना आपली घरेदारे सोडून पलायन करावे लागले. यामुळे रोहिंग्यांच्या स्थलांतराची मोठी समस्या निर्माण झाली होती.