देशातील 18 हजार गावे अंधारात का राहिली ते नामदार कॉंग्रेसने सांगावे
मोदींचे टीकास्त्र: आम्ही वीज पुरवलेल्या त्या गावांत श्रीमंत राहतात का?
रांची – केवळ श्रीमंतांसाठी कार्य करत असल्याचा आरोप करणाऱ्या कॉंग्रेसवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटल्यानंतरही 18 हजार गावे अंधारात का राहिली याचे उत्तर नामदार कॉंग्रेसने द्यावे. कामदारांच्या (सामान्य कामगार) व्यथा न जाणणारे नामदार माझ्यावर आरोप करतात. आमच्या सरकारने वीज पुरवलेल्या त्या हजारों गावांमध्ये श्रीमंत लोक राहतात का, असा सवाल मोदींनी केला.
झारखंडमधील 27 हजार कोटी रूपयांच्या पाच प्रकल्पांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले. त्यानंतर सिंद्रीमध्ये झालेल्या सभेत मोदी बोलत होते. आमच्या सरकारने वीज उपलब्ध नसलेल्या 4 कोटी कुटूंबांना वीज कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्या कुटूंबांमधील 25 लाख झारखंडचे आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
सरकारांच्या कामगिरीबाबत जनता समाधानी आहे की नाही हे ठरवण्याची मोजपट्टी लोकशाहीत निवडणूूक ही आहे, असे म्हणताना त्यांनी झारखंडमधील पंचायत निवडणुकांमध्ये भाजपने मिळवलेल्या यशाचा उल्लेख केला. यावेळी झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री रघुबर दास, केंद्रीय ऊर्जामंत्री आर.के.सिंह आदी उपस्थित होते.