दुरुस्ती सुचवलेले ६ पूल धोकादायक
मुंबई : तांत्रिक सल्लागारांनी किरकोळ दुरुस्ती करण्याची सूचना केलेले उपनगरांमधील सहा पूल धोकादायक असल्याचे फेरतपासणीमध्ये आढळून आले आहे. त्यामुळे उपनगरांतील पुलांच्या संरचनात्मक तपासणीसाठी नियुक्त केलेल्या तांत्रिक सल्लागारांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबईमधील पुलांची संरचनात्मक तपासणी करण्यासाठी पालिकेने तांत्रिक सल्लागारांची नियुक्ती केली होती. मात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळल्यानंतर पालिकेने मुंबईतील सर्वच पुलांची फेरतपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. पालिकेने नियुक्त केलेल्या तांत्रिक सल्लागारांनी मुंबईमधील ३७४ पैकी २७६ पुलांची संरचनात्मक तपासणी केली. तपासणीअंती मुंबईमधील १८ पूल धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यापैकी १४ पूल पाडून टाकण्यात आले. त्याचबरोबर काही पुलांची किरकोळ आणि काही पुलांची मोठय़ा प्रमाणावर दुरुस्ती सुचविण्यात आली होती. हिमालय पूल पडल्यानंतर तांत्रिक सल्लागारांच्या पूल तपासणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे पालिकेने मुंबईतील सर्वच पुलांचे फेरतपासणी करण्याचे आदेश तांत्रिक सल्लागारांना दिले होते. त्यानुसार पश्चिम उपनगरातील १५७, तर पूर्व उपनगरांतील ६६ पुलांची तांत्रिक तपासणीचे काम सुरू करण्यात आले असून पूर्वी किरकोळ दुरुस्ती सुचविण्यात आलेले सहा पूल धोकादायक असल्याचे तांत्रिक सल्लागारांनी जाहीर केल्याचे पूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे यापूर्वी तांत्रिक सल्लागारांनी केलेल्या पुलांच्या तपासणीच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फेरतपासणीदरम्यान पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील आणखी काही पूल धोकादायक म्हणून जाहीर होण्याची शक्यता आहे.