दानवेंबद्दलचा खैरेंचा आरोप खरा ठरला तर लोक बिथरतील – संजय राऊत

औरंगाबादमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युतीचा धर्म पाळला नाही, असा आरोप काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. यावर बोलताना शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत म्हणाले की, खासदार चंद्रकांत खैरेंचा संताप आणि वेदना समजून घेतली पाहिजे. त्यांनी केलेला दानवेंबद्दलचा आरोप खरा ठरला तर लोक बिथरतील. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
जालन्यासाठी आम्ही खोतकरांची समजूत काढली. औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरै जे दानवेंबद्दल सांगत आहेत ते जर खरं ठरलं तर लोक बिथरतील. खैरेंचा संताप आणि वेदना समजून घेतली पाहिजे, खैरे कधीही खोटं बोलत नाहीत. कागदोपत्री दानवेंचे जावई हे आमचेच आमदार आहेत. असे प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले.
बुरखाबंदीवरील अग्रेलाखामुळे शिवसेनेत मतभेत झाले आहेत का? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, माझ्या अग्रलेखाचा टायमिंग चुकला पण आमच्यात काहीही मतभेद नाही. तुम्ही काहीही मनात आणू नका, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे एकच आहेत असे स्पष्टीकरण दिले.
काय म्हणाले होते खैरे?
भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युतीचा धर्म पाळला नाही. निवडणुकीत त्यांनी आपल्याला मदत केली नाही असा आरोपही खैरेंनी केला. याची तक्रार भाजपच्या पक्षश्रेष्ठी आणि उद्धव ठाकरेंना करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दानवेंनी युतीचा नाही तर जावई धर्म पाळला, अशी टीकाही त्यांनी केली.