दहावीच्या पुस्तकांत कमळ फुलवले
मुंबई – दहावीच्या राज्यशास्त्राच्या नव्या पुस्तकात अभ्यास मंडळाने कमळ फुलवल्याचा आरोप केला जात आहे. आर्थिक सुबत्तेसाठी भाजपशिवाय पर्याय नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न पक्षाने यात केला आहे. तर, घराणेशाहीमुळे कौटुंबिक मक्तेदारी निर्माण झाल्याचे नमूद करत कॉंग्रेसला चिमटा काढला आहे.
दहावीचा अभ्यासक्रम यंदा बदलला आहे. इतिहास व राज्यशास्त्र या विषयांच्या पुस्तकांत राष्ट्रीय आणि प्रादेशिक माहिती देताना भाजप कशाप्रकारे आर्थिक सुधारणांवर भर देतो, हे पटवण्याचा प्रयत्न केला आहे. धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटक व अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क, व्यापक समाजकल्याण हे कॉंग्रेसचे धोरण असल्याचे यात नमूद केले आहे. घराणेशाहीवरून कॉंग्रेसला चिमटा काढताना कुटुंबाचा प्रभाव राहण्यासाठी नातेवाइकांना निवडणुकीत उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला जातो, असे म्हटले आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार शिवसेनेने अमराठी विरोध सौम्य केला आहे, असे पुस्तकात नमूद केले आहे.