…ती निविदा रद्द; शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश – राहूल कलाटे
- आयुक्तांच्या बैठकीतील सूचनेचा पुनर्विचार
- कचरा संकलनाची 450 कोटींची निविदा रद्द
पिंपरी- महापालिका हद्दीतील नागरिकांच्या घरोघरचा कचरा उचलून मोशीतील कचरा डेपोत वाहून नेण्याच्या कामासाठी आठ वर्षाची मुदत ठेवून काढलेली 450 कोटींची निविदा आज बुधवारी (दि. 11) स्थायी समितीच्या बैठकीत रद्द करण्यात आली. याबाबत शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याची भावना गटनेते राहूल कलाटे यांनी व्यक्त केली.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत राहणा-या नागरिकांचा घरोघरचा कचरा उचलून मोशी कचरा डेपोत वाहून नेण्यासाठी शहराची दोन भागात विभागणी करून 450 कोटींची निविदा काढली. हे काम बीव्हीजी इंडिया आणि ए. जी. एन्व्हायरो प्रा. लि. या दोन्ही कंपन्यांना आठ वर्षाच्या मुदतीवर देण्यात आली. मात्र, या निर्णयात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सिवसेनेने केला होता. दोन्ही ठेकेदारांना परस्परपुरक दर दिल्यामुळे यात रिंग झाल्याचा आरोपही सेनेने केला होता. तसेच, आठ वर्ष कामकाजाची मुदत असल्याने दोन्ही ठेकेदारांवर कोणाचेही नियंत्रण राहणार नाही, असा संशयही कलाटे यांनी व्यक्त केला होता.
त्यातच या कामासंदर्भात आयुक्तांच्या बैठकीत चार ते आठ निविदा काढाव्यात. त्यामुळे निकोप स्पर्धा होईल, अशी सूचना गटनेत्यांनी केली होती. त्याचा पुनर्विचार होऊन आज बुधवारी (दि. 11) झालेल्या स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड यांनी ही निविदा रद्द केल्याने तत्कालीन स्थायी समितीच्या भ्रष्ट कारभाराचा बुरखा फाटला आहे, अशी टिका कलाटे यांनी केली आहे.