‘ती’ गाणी ऐकताना त्रास होतो- लता मंगेशकर

काही जुनी गाणी आताच्या चित्रपटांमध्ये रिमिक्स करून वापरली जातात. बऱ्याचदा या रिमेकमध्ये रॅप समाविष्ट केला जातो आणि बदललेल्या चालीमुळे अनेकांना ती मूळ गाण्यासोबत केलेली छेडछाड वाटते. अशा रिमेक गाण्यांबाबतची नाराजी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली.
याविषयी लिहिलेल्या खुल्या पत्रात त्यांनी मूळ चालीची मोडतोड करून उथळ शब्दांचा वापर केलेली रिमिक्स गाणी ऐकताना त्रास होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. गीतकार जावेद अख्तर यांच्यासोबत त्यांची रिमेक गाण्यांविषयी बातचित झाली आणि त्यानंतर लतादीदींनी हे खुलं पत्र लिहिलं. ‘हिंदी चलचित्र संगीताचा एक सुवर्ण काळ होता. त्या काळातील गाण्यांनी भारतीयांच्या हृदयात एक स्थान मिळवलंय. आजही कोट्यवधी रसिकांना ती गाणी आवडतात आणि भविष्यातही आवडतील. या सुवर्णकाळातील गाणी आता नव्या ढंगात रिमिक्सच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांसमोर आणली जात आहेत. तरुणवर्गात ही गाणी खूप लोकप्रिय होत असल्याचं म्हटलं जातं. खरंतर यात काहीच समस्या नाही. परंतु गाण्याची मोडतोड करून ते पुन्हा सादर करणं अगदी चुकीचं आहे.