तामिळनाडूतील 13 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? – राहुल गांधी

मदुराई : तुतिकोरिनमधील स्टरलाइट कंपनीच्या विरोधात मंगळवारी झालेल्या निदर्शनांत पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये मरण पावलेल्यांची संख्या 13 वर गेली असून, परिसरात आजही प्रचंड तणाव आहे. गोळीबारामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी भेट घेण्याची शक्यता आहे. यासाठी तुतिकोरिनमधील परिस्थिती नियंत्रणात येण्याची प्रतीक्षा सध्या केली जात आहे. राहुल गांधी यांचा तामिळनाडू दौऱ्याचा कार्यक्रम एक-दोन दिवसांत निश्चित होणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, तुतिकोरिन परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. येथील सर्व रुग्णालयांत जखमींची गर्दी झाली आहे. या कंपनीच्या कॉपर प्लांट योजनेला प्रस्तावाला मद्रास उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. तसेच मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करू नये, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. पोलिसांनी पोटाच्या वरच गोळ्या माकल्याचा आरोप करण्यात आला असून, याची तपासणी केली जाणार आहे. केंद्र सरकारनंही या गोळीबाराची तसंच तेथील स्थितीची माहिती मागवली आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगही या प्रकाराची चौकशी करणार आहे.