तामिळनाडुच्या पर्यटकाची हत्या हा मानवतेचाच खून – मेहबुबा मुफ्ती
श्रीनगर – काश्मीर खोऱ्यात पर्यटनासाठी आलेल्या तामिळनाडुच्या एका पर्यटकाची तेथे झालेल्या दगडफेकीच्या घटनेत हत्या झाली आहे. या घटनेचा मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी तीव्र निषेध केला असून पर्यटकाची हत्या हा मानवतेचाच खून असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या घटनेने आपल्यातील आई हादरली आहे असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की जे कोणी दुसऱ्याला ठार मारण्यासाठी दगड उचलतात त्यांना कोणताहीं धर्म नसतो.
एस थिरूमणी नावाचे तामिळनाडुतील एक पर्यटक आपल्या कुटुंबासह काश्मीरात पर्यटनासाठी आले होते. ते तेथे झालेल्या दगडफेकीच्या घटनेत जखमी झाले. त्यांचा रूग्णालयातच मृत्यू झाला. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आज त्यांच्या वडिलांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्या म्हणाल्या की जम्मू काश्मीरात पर्यटकांच्या बाबतीत अशी घटना या आधी घडलेली नाही. त्यामुळे या विषयी आम्हाला अधिक वेदना झाल्या आहेत.
या घटनेमुळे आपली मान शरमेने खाली गेली आहे असे त्या म्हणाल्या. राज्यातील पालकांना उद्देशून त्या म्हणाल्या की आपण मुलांना काय शिकवत आहोत. दगड उचलून लोकांना मारणे ही कोणती रित? असा सवालही त्यांनी केला. असे प्रकार करणाऱ्या मुलांनी त्यांच्या पालकांनी आवरले पाहिजे असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले.