जूनमध्ये पुन्हा शेतकरी एल्गार
पुणे – शेतक-यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या लाँग मार्च नंतर शासनाने मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणीसाठी व अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेने पुन्हा एकदा रस्यावर उतरणयांचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी राज्यात पुकारणयात आलेल्या ऐतिहासिक शेतकरी संपाला 1 जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे सर्व समविचारी संघटनांना सोबत घेवून अखिल भारतीय किसान सभा सर्व सहकारी कार्यालयांना घेराव घालून तीव्र आंदोलन करणार आहे, असा इशारा किसान सभेचे नेते डॉ.अजित नवले यांनी पत्रकार सभेत दिला. यावेळी बाबा नवले, डॉ.अमोल वाघमारे , नाथा शिंगाडे , अजित अभयंकर उपस्थित होते.
नवले म्हणाले की, शेतकरी संपानंतर शेतक-यांनी नाशिक ते मुंबई असा पायी लाँग मार्च काढला होता.शासनाने याची दखल घेवून काही मागण्या मान्य केल्या होत्या. यात स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी ,वीज बिल माफ करावे, स्वस्त दरात बियाणे उपलब्ध करून देणे, वनाधिकार कायदयाची अंमलबजावणी करणे, कष्टकरी शेतकरी व शेत मजुरांना पेन्शन देणे. आदी मागण्यांचा समावेश होता. समिती स्थापन करून दीड महिन्यात या मागण्यांची अंमलबजावणी केली जाईल, असे शासनाने आशवासन दिले होते.
राज्य कृषि मूल्य आयोगाची स्थापना, नियम व कार्यपध्दती याबाबत शासनाने अदयाप कोणतीही पावले उचलली नाहीत. आंदोलकांना केवळ खोटी आश्वासने देवून दिशाभूल करायची अशीच सध्या सत्ताधा-यांची भूमिका दिसते. शासनाला त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी येत्या 1 जूनला राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांना घेराव घातला जाणार आहे.तसेच सहयांची मोहिम राबवून दहा कोटी सहया गोळा करून पंतप्रधानांना पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर देशव्यापी लढयाची घोषणा करणयात येणार आहे. महाराष्ट्रातून 20 लाख सहया गोळा करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.