जालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार

औरंगाबाद- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या लोकसभा मतदारसंघातील 51 गावे पाणी प्रश्नावर आक्रमक झाली आहेत. पैठण तालुक्यातील 11 गावांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकला आहे, तर इतर 40 गावांनी पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे.
अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न तसाच असून यावर कोणीच काही करायला तयार नाहीये, त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर येथील ग्रामस्थांनी पुढाऱ्यांना गावबंदी घातली आहे तसेच मतदानावरदेखील बहिष्कार टाकला आहे. ब्रम्हगव्हान उपसा सिंचन योजना आणि खेरडा प्रकल्प पूर्ण करावी, ही गावकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. पण, निधी नसल्यामुळे हे प्रकल्प तसेच पडून आहेत. त्यामुळे किमान निवडणुकीच्या तोंडावर तरी आपला पाणी प्रश्न मार्गी लागावा या हेतूने ग्रामस्थांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदार संघातून खासदार आहेत. ते मागील वेळी चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. या मतदारसंघात जालना, पैठण, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री या 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यापैकी अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर असल्यामुळे याचा फटका दानवेंना बसू शक्यता आहे. जालन्यातून भाजप-शिवसेना युतीकडून रावसाहेब दानवे निवडणूक मैदानात आहेत तर त्यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विलास औताडे यांना तर वंचित बहुजन आघाडीने डॉ. शरदचंद्र वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. जालना लोकसभा मतदारसंघासह राज्यातील इतर 14 ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होईल.