गतविजेत्या पुण्याचे आव्हान संपुष्टात
राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा
महिलांमध्ये उपनगर, पालघर उपांत्य फेरीत
रत्नागिरीने राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतील पुरुष गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत धक्कादायक निकालाची नोंद करताना गतविजेत्या पुण्याचे आव्हान ३०-२५ असे संपुष्टात आणले. त्यामुळे सांगली, मुंबई उपनगरप्रमाणेच पुण्याची हॅट्ट्रिकची संधी हुकली. याशिवाय पुरुषांमध्ये रायगडने आणि महिलांमध्ये मुंबई उपनगर आणि पालघरने उपांत्य फेरी गाठली.
पुरुषांमध्ये पुणे-रत्नागिरी हा सामना मध्यंतराला ११-११ असा बरोबरीत होता. उत्तरार्धात रत्नागिरीच्या रोहन उकेने (६ गुण) सामन्याला कलाटणी दिली. रत्नागिरीच्या अभिषेक भोजनेने चमकदार चढाया केल्या. पुण्याकडून सुनील दुबलेची (९ गुण) एकाकी झुंज अपयशी ठरली. दुसऱ्या लढतीत नंदुरबारने पहिल्या सत्रात १७-१२ अशी आघाडी घेतली होती, परंतु दुसऱ्या सत्रात सुल्तान डांगे, बिपिन थळे आणि मयूर कदम यांनी झुंजार खेळाचे प्रदर्शन करीत रायगडला ३४-२३ असे पराभूत केले.
महिलांमध्ये पालघरने मध्यंतरालाच २०-१३ अशी आघाडी घेत कोल्हापूरचा ३३-३१ असा पाडाव केला. पालघरच्या विजयात पूजा पाटील, ऐश्वर्या काळे, शादीब शेख आणि भाग्यश्री मुखर्जी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मुंबई उपनगरने मुंबई शहरचा ३९-२१ असा पाडाव केला. उपनगरकडून कोमल देवकर (८ गुण) आणि सायली नागवेकर (८ गुण) यांनी चतुरस्र चढाया केल्या. त्यांना पूजा जाधव (८ गुण) आणि सायली जाधवच्या पकडींची छान साथ लाभली. मुंबईकडून पूजा यादव आणि मेघा कदम यांनी पराभव टाळण्याचा शर्थीने प्रयत्न केला.
त्याआधी, झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ठाण्याने रायगडचा पाच-पाच चढायांच्या अलाहिदा डावात ३३-२९ असा पराभव केला. ठाण्याकडून हर्षला मोरे आणि निकिता म्हात्रे यांनी चकमदार खेळ केला.
जळगावच्या खेळाडूंची पंचांवर धाव
अहमदनगर आणि जळगाव यांच्यातील शुक्रवारी रात्री झालेला पुरुष गटातील साखळीतील अखेरचा सामना अतिशय रंगतदार झाला. अखेरच्या चढाईपर्यंत रंगलेल्या सामन्यात पंचांनी शिटी वाजवताच जळगावचा संघ पंच योगेश जोशी यांच्यावर धावून गेला, परंतु खासगी सुरक्षारक्षकांमुळे त्यांचा बचाव झाला.