breaking-newsताज्या घडामोडीपुणे
केंद्र-राज्यातील सत्तेत वाटा; मात्र ‘शास्ती’साठी दिखाउ ‘आटापीटा’?
- शास्तीकर माफी मिळवण्यात शिवसेना अपयशी
- निष्क्रियतेचे खापर हाणले भाजपच्या माथी
- खासदार श्रीरंग बारणे यांचा महामोर्चाचा इशारा
पिंपरी- गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपसोबत सत्तेचा मलिदा लाटणा-या शिवसेनेने शहरपातळीवरही दुटप्पी भूमिका घेतली आहे. शास्ती कराचा प्रश्न सोडण्यात आपयश आल्याने सत्तेत केंद्रात आणि राज्यात देखील विरोधात असल्याचे ढोंग शिवसेनेचे खासदार, आमदार करीत आहेत. शास्तीचा प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेल्या खासदार, आमदारांमुळे नागरिकांच्या मानगुटीवर शास्तीची तलवार कायम राहिली आहे. त्यामुळे नागरिकांच्या रोषाचे धनी बनावे लागत असल्याचे लक्षात येताच सेनेने आपल्या अपयशाचे खापर भाजपवर फोडून शास्ती कराच्या विरोधात महामोर्चा काढण्याचे नाटक केले आहे.
पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांवर आकारला जाणारा शास्ती कर पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्याच्या मागणीसाठी महामोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज सोमवारी (दि. 9) पत्रकार परिषदेत दिला आहे. आजअखेर 500 कोटीहून अधिक शास्ती कर भरणा बाकी आहे. शहरात 75 हजारहून अधिक अनधिकृत बांधकामे आहेत. मिळकत कराच्या नोंदी नसलेली हजारो बांधकामे आहेत. अनधिकृत बांधकामांवर आकारला जाणारा शास्ती कर रद्द करून बांधकामे नियमित करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी दिले होते. गेल्या अधिवेशनात याबाबत आदेश काढण्याचे सांगितले होते. मात्र, आजतागायत आदेश काढलेला नाही. त्यामुळे नागरिक शास्ती कराने हैरान झाले आहेत. शास्ती कर पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करावा, अन्यथा शास्ती कराच्या विरोधात महामोर्चा काढणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.
अनधिकृत बांधकामांवरील शास्ती कर रद्द करावा. अनधिकृत बांधकामे नियमित करावीत, यासाठी शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून मागणी केली. तरीही, सरकारकडून आश्वासनेच मिळाली, असेही बारणे म्हणाले. मुळात, हे प्रश्न सोडविण्यासाठी नागरिकांनी सेनेचे खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील आणि आमदार गौतम चाबुकस्वार यांना निवडून दिले आहे. हे खासदार, आमदार भाजपसोबत सत्तेचा मलिदा लाटत आहेत, आणि शास्ती कराचा प्रश्न सुटत नसल्याचे सांगत आहेत. तसेच, याला भाजप जबाबदार असल्याचेही भासवित आहेत. मुळात, हे अपयश सेनेचे असून याचे खापर स्वतःच्या माथ्यावर फुटू लागल्याने खासदार बारणे यांनी दुटप्पी भूमिका घेतली आहे. शास्तीचा मुद्दा घेऊन आम्ही भाजप सरकारच्या विरोधात असल्याचे नाटक केले आहे. शास्तीचा प्रश्न सुटत नसल्याने महामोर्चा काढण्याचा मार्ग अवलंबला आहे.
पोलीस ठाणे, चौक्या बनली हप्ते वसुलीची केंद्रे- बारणे
सरकारने सत्ता स्थापन केल्यापासून पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा जरब राहिलेला नाही. त्यामुळे दिवसाढवळ्या धमक्या देऊन कायदा धाब्यावर बसविला जात आहे. या परिस्थितीला राजकीय व्यक्तीदेखील जबाबदार आहेत. पोलिसांचा कसलाही वचक राहिलेला नाही. पोलीस ठाणे, पोलीस चौक्या हप्ते वसुलीची केंद्रे बनली आहेत. गुन्हेगारांना अभय देऊन सर्वसामान्य नागरिकांवर खोट्या तक्रारी केल्या जात आहेत.