कृषीमंत्री फुंडकरांच्या घरावर शेतकरी मोर्चा
वर्धा: कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या खामगाव येथील घरावर आज किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकरी मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चासह एकूण २४ जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेने हा मोर्चा आयोजित केला आहे.
नाशिक येथील एक लाख शेतकऱ्यांचा महामुक्काम सत्याग्रह, दुष्काळ प्रश्नी औरंगाबाद आयुक्त कार्यालयावरील शेतकरी आक्रोश सत्याग्रह, ठाणे येथील तिरडी मोर्चा व वाडा, जिल्हा पालघर येथील आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या घराला साठ हजार शेतकऱ्यांनी टाकलेला महाघेराव या आंदोलनानंतर आता थेट कृषिमंत्र्यांनाच किसान सभेकडून लक्ष केले जाणार आहे.
शेतक-यांना संपूर्ण कर्जमुक्त करा, शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा धरून हमी भाव द्या, स्वामिनाथन समितीच्या शेतकरी हिताच्या सर्व शिफारशींची अंमलबजावणी करा, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडोर, वन जमिनीत वृक्षारोपण या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचे कारस्थान त्वरित थांबवा, अशा विविध मागण्यांसाठी हा आसूड मोर्चा काढण्यात येणार आहे.