कर्नाटकातील जनता भाजपला धडा शिकवेल – मल्लिकार्जून खरगे
कलबुर्गी – कर्नाटकातील जनता भाजपला धडा शिकवेल आणि त्यांची घमेंड उतरवेल. संघाच्या सल्ल्यावर चालणारे भाजप प्रणित एनडीएचे सरकार आम्हाला चालणार नाही असा संदेश या निवडणुकीच्या निमीत्ताने या राज्यातील जनता देशाला देईल असा विश्वास लोकसभेतील कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जून खरगे यांनी व्यक्त केला आहे.
ते म्हणाले की कर्नाटकातील निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच लढवत आहोत पण हा एक वैचारीक लढाही आहे. लोकांना गृहीत धरून भाजपने मनमानी कारभार चालवला आहे त्याला जनताच आता उत्तर देईल असे ते म्हणाले. देशातील उपेक्षित गरीब, दलित आणि अल्पसंख्याकांना या राजवटीत असुरक्षित वाटू लागले आहे. ते या घटकांकडे दुर्लक्ष करून स्वताचाच अजेंडा चालवत आहेत. त्यामुळे त्यांना पराभूत करणे गरजेच आहे त्यामुळे कर्नाटकातील निवडणूक कॉंग्रेस साठीच नव्हे तर साऱ्या देशासाठी महत्वाची आहे. जनतेला उद्देशून आवाहन करताना ते म्हणाले की तुम्ही जर भाजपला येथे रोखले नाहीं तर ते देशातील लोकशाहीच नष्ट करतील. त्यामुळे राष्ट्रहिताच्या दृष्टीने कर्नाटकातील निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे असे त्यांनी आज पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
निवडणूक पुर्व मतदान चाचण्यांमध्ये कर्नाटकात त्रिशंकु विधानसभा अस्तित्वात येईल असे भाकीत करण्यात आले आहे त्या विषयी विचारले असता खरगे म्हणाले की या चाचण्या हेतुपुरस्सर असतात. कोणत्या निकषावर ते या चाचण्या घेतात त्यावर त्याचे निष्कर्ष अवलंबून असतात. आज कर्नाटक हे राज्य कायदा आणि सुव्यवस्था, विकास, गुंतवणूक इत्यादी निकषांच्या आधारे देशातील एक प्रगत राज्य आहे. त्यामुळे या राज्यात कॉंग्रेस पक्षच आघाडीवर राहींल असे ते म्हणाले. राज्यात कॉंग्रेसचाच अधिक प्रभाव दिसू लागल्याने आज भाजपने 30 ते 40 केंद्रीय मंत्री, विविध राज्यांमधील सुमारे शंभर मंत्री, आणि संघाचे कार्यकर्ते डोअर टू डोअर प्रचारसाठी लावले आहेत. त्यातून भाजप किती घाबरली आहे हे दिसून येते असे ते म्हणाले.