उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी…
डॉ. वैशाली नहाटा, त्वचारोगतज्ज्ञ
उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. ऋतूनुसार आपल्या त्वचेतही बदल होत असतात. उन्हाळ्यात त्वचा ऊन व घामामुळे तेलकट होते. त्वचा काळवंडणे, घामोळ्या येणं, खाज सुटणं, काळे चट्टे येणं असे अनेक त्रास उद्भवू शकतात. औद्योगिक क्रांतीनंतर ओझोनच्या थरावर झालेल्या परिणामामुळे पृथ्वीच्या पर्यावरणावर मोठा परिणाम झालेला दिसतो. त्यामुळे हानिकारक सूर्यकिरण जसे यूव्हिसी (२००-२९० एनएम) आता पृथ्वीपर्यंत येऊ लागले आहेत. या सूर्यकिरणांच्या संपर्कात त्वचा आल्यामुळे प्रीमॅच्युअर एजिंग म्हणजेच त्वचेवर वार्धक्याच्या खुणा लवकर दिसू लागतात. त्वचेवरील नव्वद टक्के सुरकुत्या उन्हामुळे पडतात. प्रदूषणाला व सूर्यकिरणांना सतत सामोरा जाणारा शरीरावरील अत्यंत संवेदनशील भाग म्हणजे त्वचा. म्हणूनच एखादी व्यक्तीला सनबर्न होऊ शकतो. सनबर्नमुळे त्वचेवर लाल रंगाचे चट्टे उमटतात किंवा त्वचा भाजल्यासारखी होते. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणंच योग्य ठरते.
भारतीयांची त्वचा टाइप lV आणि V मध्ये येते. कारण आपल्या त्वचेत melanim, रंग बनवणाऱ्या पेशी जास्त आहेत व या पेशी आपल्या त्वचेची सुरक्षा करतात. या उलट विदेशी खास करून युरोपियन, अमेरिकन हे जास्त गोरे असल्यामुळे टाईप I व III मध्ये येतात. त्यांच्यात melanim व रंग बनवणाऱ्या पेशी कमी असतात. म्हणूनच त्यांच्या त्वचेवर सूर्यकिरणांमुळे होणारे बदल जास्त दिसतात व सूर्यकिरणांमुळे होणारे त्वचेचा कर्करोग ही जास्त प्रमाणात आढळतात.
उन्हाळ्याची चाहुल लागल्याने आपले आरोग्य सांभाळण्याची सतर्कता नागरिकांनी घ्यावी. यासाठी काही उपाययोजना केल्यास आपली त्वचा सुरक्षित ठेवता येऊ शकते.
सनस्क्रनिचे SPF (सन प्रोटक्शन फॅक्टर) तीस किंवा तीसपेक्षा जास्त असावं.
कॉस्मेटिकपेक्षा मेडिकल सनस्क्रनि नेहमी जास्त उपयुक्त असतात.
उन्हापासून संरक्षण करण्यासाठी फक्त SPF (सन प्रोटक्शन फॅक्टर) पुरेसं नाही. तुमची त्वचा सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचवण्यासाठी ब्रॉड स्पेकट्रम सन प्रोटेक्शन लोशनचा वापर करा.
सनस्क्रिन लावताना भरपूर प्रमाणात लावणं. उदा. ३ एमएल (अर्ध्या चमच्यापेक्षा जास्त) चेहऱ्यासाठी व गळ्यासाठी. ६ एमएल प्रत्येक हात व पायासाठी.
सनस्क्रिन उन्हात जायच्या २० मिनिटे अगोदर चेहऱ्यावर व शरीराच्या इचर भागावर लावावं.
जेव्हा खूप घाम येतो किंवा तुम्ही पाण्यात जाता तेव्हा सनस्क्रिन प्रत्येकी चाळीस मिनिटांनी लावावं. सनस्क्रिन नेहमी Water Resistant असावं.
गाडीच्या काचा (चारचाकी वाहन) अतिनील किरण थोपवत नाहीत. त्यामुळे गाडीत प्रवास असला तरी सनस्क्रिन लावावं.