उत्तर भारतात उष्णतेची तीव्र लाट…
नवी दिल्ली – संपूर्ण उत्तर भारतामध्ये सध्या उष्णतेची तीव्र लाट सुरू आहे. त्यामुळे सार्वजनिक जनजीवनावरही परीणाम झाला आहे. राजस्थानातील वाळवंटी प्रदेशामध्ये तापमान 49 अंशांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. राजधानी दिल्लीमध्येही कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे. या मौसमातील सरासरी तापमानापेक्षा 4 अंशांनी जास्त म्हणजे 44 अंश इतके येथील तापमान नोंदवले गेले आहे. हवामान खात्याने उद्या दिल्लीमध्ये पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे तापमानात थोडी घट होण्याची शक्यता आहे.
राजस्थानात चुरू, बिकानेर, पिलानी, कोटा, जैसलमेर या पाच ठिकाणी 45 अंशांच्या वर तापमान नोंदवले गेले आहे. श्रीगंगानगर येथे सर्वाधिक 48.7 अंश तापमानाची नोंद झाली. दक्षिण भारतात केरळमध्ये मान्सून दाखल झाला असताना उत्तर भारतात उन्हाचा कडाका वाढलेला आहे. उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील भागामध्ये काही ठिकाणी धुळीच्या वावटळी आणि वादळासारखी स्थिती निर्माण झाली होती.
अलाहबाद, मोदरादाबाद, गोरखपूर, वाराणसी आणि कानपूर येथे दिवसाचे तापमान सामान्यापेक्षा जास्त होते. तर काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काल उत्तर प्रदेशात काही ठिकाणी झालेल्या वादळी पावसात किमान 10 जणांचा मृत्यू झाला होता.
पंजाब आणि हरियाणामध्येही उष्णतेची लाट कायम आहे. जम्मू काश्मीरमधील जम्मू शहरात आणि मध्यप्रदेशचा पूर्व भागातही उष्णतेचा कडाका कायम आहे.