उत्तर प्रदेश, बिहारमध्ये वादळी पावसाचे 34 बळी

- दोन दिवस वादळी पावसाचा इशारा
लखनौ – उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये झालेल्या गडगडाटी वादळामुळे किमान 34 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक भागांमधील घरांची पडझड आणि झाडे कोसळली आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. काल रात्री बिहारमध्ये झालेल्या गडगडाटी वादळामुळे किमान 19 जणांचा मृत्यू झाला. गया आणि औरंगाबाद या जिल्ह्यंमध्ये प्रत्येकी 5 जण मरण पावले आहेत. तर मुंगेर, कातिहार आणि नवाडा या जिल्ह्यांमध्ये अन्य मृत्यू झाले आहेत, असे बिहारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.
उत्तर प्रदेशमध्ये एकूण 15 जण मरण पावले तर 10 जण जखमी झाले आहेत, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यापैकी 6 जण उन्नावमध्ये झालेल्या वादळ आणि वीज पडल्याने मरण पावले. तर रायबरेलीमध्ये 3 आणि कानपूर, पिलभीत आणि गोंडा जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोघेजण मरण पावले. उन्नावमधील दोघेजण वीज पडल्यामुळे तर अन्य बाकी सर्व घरे कोसळल्याने मरण पावले. याशिवाय उन्नावमध्ये 4, कनौज आणि रायबरेलीमध्ये प्रत्येकी तिघेजण जखमी झाले आहेत. या वादळामध्ये अनेक झोपड्या उद्ध्वस्त झाल्या आहेत.
आपत्तीग्रस्तांना 24 तासात मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा दंडाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव अवानिश अवस्थी यांनी सांगितले. अनेक मार्गांवर झाडे पडल्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत.
आगामी दोन दिवसात वादळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर वीज कोसळण्याच्या घटनांचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत आणि भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. मार्च महिन्यात झालेल्या धुळीच्या वादळामुळे किमान 134 लोक मृत्यूमुखी पडले होते. तर 400 जण जखमी झाले होते. उत्तर प्रदेशात सर्वाधिक 80 जण मरण पावले होते.